Back to Languages

    Marathi - Chapter 58

    Translation by Muhammad Shafi I Ansari

    Verse 1

    १. निश्चितच, अल्लाहने त्या स्त्रीचे म्हणणे ऐकले, जी तुमच्याशी आपल्या पतीबाबत वाद घालीत होती, आणि अल्लाहसमोर गाऱ्हाणे करीत होती. अल्लाह तुम्हा दोघांचा वार्तालाप (वादविवाद) ऐकत होता. निःसंशय, अल्लाह ऐकणारा, पाहणारा आहे

    Verse 2

    २. तुमच्यापैकी जे लोक आपल्या पत्नींशी जिहार करतात (म्हणजे त्यांना माता संबोधून बसतात) त्या वास्तविक त्यांच्या माता नाहीत, त्यांच्या माता तर त्याच आहेत, ज्यांच्या गर्भातून त्यांनी जन्म घेतला आहे, निःसंशय हे लोक एक अयोग्य आणि असत्य गोष्ट बोलतात. निःसंशय, अल्लाह मोठा क्षमाशील आणि माफ करणारा आहे

    Verse 3

    ३. जे लोक आपल्या पत्नींशी जिहार करून बसतील, मग आपले कथन परत घेतील तर त्यांना, आपसात एकमेकांना हात लावण्याआधी एक गुलाम (दास) मुक्त करावा लागेल. याच्याद्वारे तुम्हाला उपदेश केला जात आहे, आणि अल्लाह तुमच्या समस्त कर्मांना जाणतो

    Verse 4

    ४. तथापि ज्याला गुलाम आढळून न आला तर त्याने दोन महीने सतत रोजे राखावेत, यापूर्वी की एकमेकांना हात लावावा आणि ज्याला याचेही सामर्थ्य नसेल तर त्याने साठ गरीबांना जेऊ घालावे, हे यासाठी की तुम्ही अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखावे. या अल्लाहने निर्धारित केलेल्या सीमा (मर्यादा) आहेत आणि काफिरांसाठीच दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातना) आहेत

    Verse 5

    ५. निःसंशय, जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा विरोध करतात ते अपमानित केले जातील, जसे त्यांच्या पूर्वीचे लोक अपमानित केले गेले आणि निःसंशय, आम्ही स्पष्ट आयती अवतरित केल्या आहेत आणि काफिर (सत्य विरोधक) लोकांसाठी अपमानित करणारा अज़ाब आहे

    Verse 6

    ६. ज्या दिवशी अल्लाह त्या सर्वांना (जिवंत करून) उठविल, मग त्यांना त्यांच्या कृत-कर्मांशी अवगत करील (ज्यास) अल्लाहने मोजून ठेवले आहे आणि ज्याचा यांना विसर पडला होता आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीशी अवगत आहे

    Verse 7

    ७. काय तुम्ही नाही पाहिले की अल्लाह आकाशांची व जमिनीची प्रत्येक गोष्ट जाणतो. असे नाही होत की तीन माणसांमध्ये कानगोष्टी व्हाव्यात आणि त्यांच्यात चौथा अल्लाह नसावा आणि ना पाच माणसांमध्ये, व त्यांच्यात सहावा अल्लाह नसावा. कानगोष्टी करणारे याहून कमी असोत किंवा जास्त असोत, तो त्यांच्यासोबतच असतो. मग ते कोठेही असोत, मग कयामतच्या दिवशी त्यांना त्यांच्या कर्मांशी अवगत करविल. निःसंशय, अल्लाह प्रत्येक गोष्टीचे ज्ञान बाळगतो

    Verse 8

    ८. काय तुम्ही त्या लोकांना नाही पाहिले, ज्यांना कानगोष्टी करण्यापासून रोखले गेले होते, तरीही ते त्या मनाई केलेल्या कामाला पुन्हा करतात आणि आपसात अपराधाच्या, अन्यायाच्या आणि पैगंबराशी अवज्ञा करण्याच्या कानगोष्टी करतात आणि जेव्हा तुमच्याजवळ येतात, तेव्हा तुम्हाला त्या शब्दांत सलाम करतात, ज्या शब्दांत अल्लाहने सांगितले नाही, आणि आपल्या मनात म्हणतात की अल्लाह आम्हाला आमच्या अशा बोलण्यावर शिक्षा का नाही देत? त्यांच्यासाठी जहन्नम पुरेशी आहे, ज्यात हे लोक दाखल होतील, तेव्हा किती वाईट ठिकाण आहे

    Verse 9

    ९. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुम्ही कानगोष्टी कराल तर या कानगोष्टी अपराध, अतिरेक (उदंडता) आणि पैगंबरांची अवज्ञासंबंधी नसाव्यात. किंबहुना सत्कर्म आणि अल्लाहच्या भयासंबंध असाव्यात आणि त्या अल्लाहचे भय बाळगत राहा, ज्याच्याजवळ तुम्ही एकत्रित केले जाल

    Verse 10

    १०. (वाईट) कानगोष्टी सैतानाचे काम आहे, ज्यामुळे ईमानधारकांना दुःख व्हावे.१ वस्तुतः अल्लाहच्या मर्जीविना तो त्यांना काहीच नुकसान पोहचवू शकत नाही. आणि ईमान राखणाऱ्यांनी अल्लाहवरच भरवसा ठेवला पाहिजे

    Verse 11

    ११. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुम्हाला सांगितले जाईल की सभा-बैठकांमध्ये जरा विस्तारपूर्वक बसा, तेव्हा तुम्ही जागा व्यापक करा. अल्लाह तुम्हाला विस्तार प्रदान करेल आणि जेव्हा सांगितले जाईल की उठून उभे राहा, तेव्हा तुम्ही उठून उभे राहा. १ अल्लाह तुमच्यापैकी त्या लोकांचे, ज्यांनी ईमान राखले आहे व ज्यांना ज्ञान दिले गेले आहे, दर्जा उंचाविल आणि अल्लाह (ते प्रत्येक कर्म) जे तुम्ही करीत आहात, (चांगल्या प्रकारे) जाणतो

    Verse 12

    १२. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुम्ही पैगंबराशी एकांतात बोलू इच्छित असाल तर आपल्या या एकांतात बोलण्यापूर्वी काही दान (सदका) करत जा, हे तुमच्यासाठी अधिक चांगले आणि पवित्र (निर्मळ) आहे, मात्र जर काहीच नसेल तर निःसंशय, अल्लाह माफ करणारा, दया करणारा आहे

    Verse 13

    १३. काय तुम्ही कानगोष्टीपूर्वी दान करण्यास भ्याले तर जेव्हा तुम्ही असे केले नाही आणि अल्लाहने देखील तुम्हाला माफ केले तेव्हा आता (उचितपणे) नमाजांना कायम राखा, जकात देत राहा आणि अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या आदेशाचे पालन करीत राहा आणि तुम्ही जे काही करता ते सर्व अल्लाह (चांगल्या प्रकारे) जाणून आहे

    Verse 14

    १४. काय तुम्ही त्या लोकांना नाही पाहिले, ज्यांनी त्या जनसमूहाशी मैत्री केली, ज्यांच्यावर अल्लाह नाराज झाला आहे, हे ना तुमच्यापैकी आहेत, ना त्यांच्यापैकी, आणि ज्ञान असतानाही खोट्या गोष्टींवर शपथ घेत आहेत

    Verse 15

    १५. अल्लाहने त्यांच्यासाठी कठोर शिक्षा यातना तयार करून ठेवली आहे. खात्रीने हे जे काही करीत आहेत, वाईट करीत आहेत

    Verse 16

    १६. या लोकांनी आपल्या शपथांना ढाल बनवून ठेवले आहे आणि लोकांना अल्लाहच्या मार्गापासून रोखतात, तेव्हा त्यांच्यासाठी अपमानदायक अज़ाब (शिक्षा-यातना) आहे

    Verse 17

    १७. त्यांची धन-संपत्ती आणि त्यांची संतती अल्लाहसमोर काहीच उपयोगी पडणार नाही. हे तर जहन्नममध्ये जाणार आहेत, नेहमी तिच्यातच राहतील

    Verse 18

    १८. ज्या दिवशी अल्लाह त्या सर्वांना उठवून उभे करील, तेव्हा हे ज्या प्रकारे तुमच्यासमोर शपथ घेतात, अल्लाहच्या समोरही शपथ घेऊ लागतील आणि समजतील की ते देखील एखाद्या (प्रमाणा) वर आहेत, विश्वास करा की निःसंशय तेच खोटारडे आहेत

    Verse 19

    १९. त्याच्यावर सैतानाने वर्चस्व प्राप्त केले आहे आणि त्यांना अल्लाहच्या स्मरणाचा विसर पाडला आहे. ही सैतानाची सेना आहे. ऐका! सैतानाची सेनाच तोट्यात राहणार आहे

    Verse 20

    २०. निःसंशय, अल्लाहचा आणि त्याच्या पैगंबराचा जे लोक विरोध करतात, तेच लोक सवार्धिक अपमानित होणाऱ्यांपैकी आहेत

    Verse 21

    २१. अल्लाहने लिहून टाकले आहे की निःसंशय, मी आणि माझे रसूल वर्चस्वशाली (विजयी) राहतील. निःसंशय, अल्लाह मोठा शक्तिशाली आणि वर्चस्वशाली आहे

    Verse 22

    २२. अल्लाहवर आणि कयामतच्या दिवसावर ईमान राखणाऱ्यांना तुम्ही अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या विरोधकांशी स्नेह प्रेम राखत असलेले पाहणार नाही, मग ते त्यांचे पिता किंवा त्यांचे पुत्र किंवा त्यांचे बांधव किंवा त्यांचे नातेवाईक (कुटुंबाच्या जवळचे) का असेनात हेच लोक आहेत, ज्यांच्या मनात अल्लाहने ईमान लिहून दिले आहे, आणि ज्यांचे समर्थन आपल्या आत्म्याद्वारे केले आहे आणि ज्यांना अशा जन्नतींमध्ये दाखल करील, ज्यांच्या खाली (थंड) पाण्याचे प्रवाह वाहत आहेत, जिथे हे सदैव काळ राहतील. अल्लाह त्यांच्याशी राजी आहे आणि हे अल्लाहशी राजी आहेत. ही अल्लाहची फौज आहे. जाणून घ्या की निःसंशय, अल्लाहच्या समूहाचे लोकच यशस्वी लोक आहेत